|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.21°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home » अन्वयार्थ : तरुण विजय, संवाद » भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का?

भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का?

अन्वयार्थ : तरुण विजय
भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का? –
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी धरणे देणे, जैन समाजाचे अल्पसंख्यक घोषित होणे, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत जाणे आणि पुन्हा भारतीय मासेमारांची श्रीलंकेकडून झालेली अटक… या सार्‍या घटना एकमेकांशी असंबद्ध वाटतात. मात्र, यातून केवळ एकच संदेश मिळतो आणि तो म्हणजे दिल्लीत प्रचंड प्रमाणात अनागोंदी, अराजकता आहे. देशात निव्वळ तमाशा, राज्यघटनेशी खेळ सुरू असून देशावर कुणाचेही, कसलेही नियंत्रण नाही, हेच पावलोपावली दिसत आहे. आज देशहिताच्या बाजूने बोलणारा कोण उरला आहे? सर्वच, आपापल्या तात्कालिक फायद्यासाठी ती भाषा बोलत आहे, जी एका छोट्या समूहाला किंवा मर्यादित भागालाच सुखावणारी असेल. राष्ट्राचे दीर्घकालीन चिंतन कुणीही करीत नाही.
दिल्लीत तुघलकी वातावरण आहे. कुठल्याही कार्यालयात काम होताना दिसत नाही. निवडणुकीत नेते आणि मंत्री व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या तीव्र गतीने लोकप्रियतेचे शिखर गाठले, त्याहून अधिक तीव्रतेने लोकांमधील नैराश्य वाढत आहे. वास्तविक, जैन समाजाला मुसलमान आणि ख्रिश्‍चनांच्या बरोबरीने अल्पसंख्यकत्वाचा दर्जा दिल्यानंतर हिंदू समाजाला धक्का बसायला हवा होता. मात्र, आता असे वाटू लागले आहे की, हिंदूंना आता केवळ मते तथा निवडणुकीचीच अधिक चिंता असून सामाजिक घडी विस्कटण्याची नाही. कुणीही जैन समाजाच्या नेत्यांना हे नाही विचारले की, हिंदू समाजाचे अभिन्न अंग असूनही आपल्याला पुढे जाण्याची कोणती संधी मिळाली नाही तथा अन्याय, उपेक्षा आणि तिरस्काराच्या अशा कुठल्या घटना घडल्या की, हिंदू म्हणून राहण्यात आता कुठलाही लाभ नाही, असे तुम्हाला वाटू लागले?
श्रीलंकेचे नौसैनिक निर्दयतेने आणि दादागिरी करून भारतीय मासेमारांना पकडतात, दोन-दोन, तीन-तीन महिन्यांपर्यंत या मासेमारांच्या क्षेमकुशलतेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती दिली जात नाही, या मासेमारांच्या नौका तोडून टाकल्या जातात, जाळे समुद्रात फेकून दिले जाते. या सार्‍या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या आपत्तीबाबत कोण विचार करतो? जोपर्यंत कुठले भयानक संकट कोसळत नाही तोपर्यंत विन्ध्यच्या या बाजूचा भारत त्या बाजूच्या भारतापासून अपरिचितच राहतो. केंद्र सरकार या भारतीय तामीळ मासेमारांचे संरक्षण करण्याबाबत मुळीच गंभीर नाही, तर मग अशा परिस्थितीत संकटात सापडलेले भारतीय नागरिक कुणाकडून मदतीची अपेक्षा करणार?
जो भारत आतापर्यंत आपल्या सॉफ्टवेअर अभियंत्यांमुळे आणि संगणकक्रांतीसाठी संपूर्ण विश्‍वात प्रसिद्धीस पावत होता, आज तो जगात महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित तथा महिलांच्या विटंबनेत सर्वाधिक आघाडीवर असलेला देश म्हणून ओळखला जात आहे. येथील गृहमंत्री आपल्याच पक्षाने समर्थन दिलेल्या मुख्यमंत्र्याबाबत तिरस्कारपूर्ण शब्द वापरतात आणि मंत्रिपद भूषविलेले बडे नेते, देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, जे भारताच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत, त्यांना ‘चायवाला’ असे हिणवून आपल्या ‘सुसंस्कृत’पणाचा परिचय देतात.
उत्तरप्रदेशात मुलायमसिंह यादव यांना नरेंद्र मोदींच्या विरुद्ध बोलण्यास जेव्हा दुसरा कुठलाही विषय मिळाला नाही तेव्हा त्यांनंी १२ वर्षे जुना दंगलींचा विषय उकरून काढला आणि ते मोदींवर असे आरोप करीत सुटले की, ज्यामुळे सामाजिक समरसतेवर आघात होऊ शकतात. मुजफ्फरनगर दंगलींच्या भयंकर कालखंडात मुख्यमंत्री आणि त्यांचे चाहते (ज्यांना मुस्लिमांचा तारणहार म्हटले जाते) हे युरोपच्या दौर्‍यावर गेले होते. मात्र, मुलायमसिंह यांनी त्याबाबत अवाक्षरही काढले नाही. पण, मोदींना विरोध करण्यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेषाचे विष पसरवणे त्यांना अधिक सोयीचे वाटले.
या भंपक आणि कालबाह्य मुद्यांचे राजकारण करणार्‍या नेत्यांना लोक आता साफ कंटाळले आहेत. भारतातील युवकांमध्ये साहस, धैर्य, आत्मविश्‍वास आणि अन्य गुणवत्तेची मुळीच कमतरता नाही. भारतात किंवा भारताबाहेर जेथे कुठे या युवकांना संधी मिळते तेथे ते आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवतातच. मात्र, भ्रष्ट आणि दांभिक नेत्यांचे जाळे देशाला प्रगती करू देत नाही. कोळशाचे अपार साठे असूनही, याच भ्रष्ट नेत्यांमुळे २५ हजार कोटी रुपयांचा कोळसा भारताला अव्वाच्या सव्वा किंमत देऊन आयात करावा लागला. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत आणि ज्या नेत्यांवर जनतेने विश्‍वास टाकून त्यांना प्रामाणिक आणि सरळमार्गी सरकार चालविण्याची संधी दिली ते रंगमंचावरील कलाकार आणि कायद्याचा अवमान करणार्‍या मंत्र्यांना वाचविण्याचा आटापिटा करीत आहेत.
या अशा हिंदुस्थानचे चित्र बदलविण्याची संधी आता चालून येत आहे. जे मीडिया चॅनेल्स तथा विशिष्ट वर्ग तीव्र मोदीविरोधी म्हणून ओळखले जात होते, त्यांनाही आता निरुपायाने खरे चित्र समोर आणावे लागत आहे आणि उत्तरप्रदेशात भाजपाला १० ते १५ जागा देणारी मंडळी आता जनमत सर्वेक्षणातून मोदींच्या नेतृत्वात ५० हूनही अधिक जागा भाजपाला मिळतील, अशी शक्यता वर्तवू लागली आहेत. भारतात ज्या व्यक्तीला सर्वाधिक विरोधाचा तसेच निषेध अभियानाचा सामना करावा लागला तीच व्यक्ती आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय नायकाच्या रूपात उदयास आली आहे. गरिबी, असुरक्षितता आणि निराशेच्या गर्तेत पडलेला भारताचा नागरिक आता समग्र परिवर्तनाची हाक देत आहे. ही संधी अनेक दशकांनंतर मिळाली आहे.
भारत भलेही खंडित स्वरूपात १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. पण, सनातन भारताची यात्रा तर हजारो वर्षांपासून अविरतपणे सुरूच आहे. या प्रवासाच्या कालखंडात उत्थान, पतन, विजय आणि पराभवाचे अनेक प्रसंग आले. आता १९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात जे सुधारणावादी आंदोलन सुरू होते अगदी त्याचप्रमाणे नवभारताचा भाग्योदय होणारच, असे वातावरण देशात तयार होत आहे. तेव्हा भारत आपल्या महान नियतीच्या दिशेने अग्रेसर झाला आहे, असे आम्ही म्हणू शकतो काय?
(लेखक भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत.)

Posted by : | on : 6 Feb 2014
Filed under : अन्वयार्थ : तरुण विजय, संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g