शेख हसीनांना भारत मदत करणार
नवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर राजीनामा भारतात आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. आपला देश त्यांना आवश्यक ती मदत करणार आहे, तसे आश्वासन सरकारने हसीना यांना दिले आहे. पुढे काय करायचे आहे, हे ठरविण्यासाठीही त्यांना आवश्यक तो अवधी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली.
संसद भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बांगलादेशात भारताचे सुमारे १० हजार विद्यार्थी आहेत. त्यांचा सुरक्षित भारतात परतण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपल्या सरकारने तेथील लष्करप्रमुखासोबत संपर्क साधला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला. अल्पसंख्यक असलेल्या हिंदूंवर केले जात आहेत, त्यांच्या घरांची आणि हिंदू मंदिरांची नासधूस केली जात आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.
विदेशी शक्तींचा हात नाकारता येत नाही
यावेळी विविध राजकीय नेत्यांनी जयशंकर यांना प्रश्न विचारले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, बांगलादेशातील स्थिती इतकी स्फोटक बनविण्यामागे विदेशी शक्तींचा हात असू शकतो का, असा विचारला. यावर जयशंकर म्हणाले की, विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. तिथे प्रचंड अस्थिरता आहे आणि या संपूर्ण स्थितीवर भारत सरकारचे बारीक लक्ष आहे.
सरकारला संपूर्ण सहकार्य
बांगलादेशातील स्थितीचे भारतात पडसाद उमटणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन ठोस निर्णय घ्यायला हवे, माहिती जयशंकर यांनी दिली. यावेळी बैठकीत उपस्थित सर्व राजकीय पक्ष नेत्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
on - मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४,
Filed under - परराष्ट्र , राष्ट्रीय , external-affairs , national
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा