ज्या बहिणींचे अर्ज रखडले त्यांना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार
– योजनेचा औपचारिक शुभारंभ,
पुणे, (१७ ऑगस्ट) – ही खटाखटसारखी नाही, फटाफट चालणारी योजना आहे. ज्या बहिणींचे अर्ज रखडले, त्यांना तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकदम मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. लाडकी बहीण योजनेचा औपचारिक शुभारंभ झाला. सुरुवात पुण्यापासून का, असे मला विचारण्यात आले. ज्यावेळी परकियांचे आक्रमण झाले, तेव्हा आई जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सांगितले की, महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे शहर आहे, असे फडणवीस म्हणाले.
देना बँक सरकार
आमचे देना बँक सरकार आहे. याआधी राज्यात लेना बँक सरकार होते. मागच्या काळातील सरकार वसुली करणारे होते. आताचे सरकार बहिणींना देणारे आहे. योजनेची सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आता काही मोजक्याच महिला बाकी आहेत. काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतील, असे फडणवीस म्हणाले.
सावत्र भावांच्या पोटात खूप दुखले
आम्ही या योजनेची घोषणा केली, तेव्हा सावत्र भावांच्या पोटात खूप योजना होऊ नये म्हणून ते न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना फटकारल्यानंतर जाणीवपूर्वक अर्ज भरून घेत, त्यावर पुरुषांचे फोटो लावले; जेणेकरून महिलांना सांगता येईल की, तुमचे अर्ज आम्ही सरकारला दिले होते. सरकारने ते अर्ज स्वीकारले नाही. काही ठिकाणी मोटरसायकलचे फोटो लावले. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून अर्ज नाकारले जातील आणि महिलांना मिळू नये, असा प्रयत्न करण्यात आला. पोर्टल स्लो व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला. पोर्टल बंद पडले, असा अपप्रचार केला. आम्ही ऑफलाईन अर्ज स्वीकारले. ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले, असे फडणवीस यांनी सांगितले.

on - शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा