रम्य ते बालपण

 balpanतुम्हाले सांगते राजेहो, लाह्यानपनच्या आठुनी कहीभी आठुल्या ना तं जीव कसा हरकून जाते!
या खेळाईच्या नादात शाळेचंभी भान नाही राहे. रडतकुथत कसंतरी शाळेत जावंं लागे. शाळेत गुरुजीले जर का समजलं का या पोट्ट्यानं अभ्यास नाही केला, तर असं सपासप रुळानं झोडपून काढत का, इचारायची सोयच नाही! पन् काही होवो, शाळा सुटली रे सुटली तर पुना खेळाईशिवाय दुसरं काहीच करो नाही! गावभर भटकनं काय, चिचा, बोरं, पेरू, आंबे झाडावर चढूनाशन भकाभक खानं काय, भल्लीच मजा करो आम्ही! सुट्टीच्या दिवशी आमराईतल्या झाडाईवर डाबडुबलीचा खेळ तं असा रंगे का जेवाय-खावायचं भानच नाही राहे!थ्या झाडाईवरच्या शिवाशिवीच्या खेळात जर का कोनी पोट्टं खाली पडलं अन् त्याले रगत आलं तर घरी काही सांगायची सोयच नव्हती.जर का घरच्याईले समजलं तर आणखीन त्याईच्या हातचा मार खावा लागे!
नदीवर पोहायले जावो ना आम्ही तं भल्लीच मजा ये! काढले सारे आंगातले कपडे का मारल्या नदीत भकाभक उड्या! काही काही पोट्टे तर भलकसेच कुचीन! चिपचाप नदीच्या बाहेर येऊन कोणाचे तरी कपडेच लपवून ठेवत! मंग त्या पोट्ट्याले घरी जायची भल्ली लाज वाटे.
होळीच्या दिवशी तर इचारायचीच सोय नाही! भल्लाच चेव चढे आम्हाले! होळीसाठी लाकडं जमा करनं घरोघरी जाऊन! नाही देल्ले तर आना चोरून! शेणाच्या चाकोल्या पोट्टे आपापल्या घरी करून वाळवून ठेवत. पुरणाचा नैवेद्य तर राहेच. एकदा का नैवेद्य होळीले देल्ला अन् होळी पेटवली तर मग लागे पोट्टे बोंबा मारायले! रातभर धिंगाणा राहे. काहीबाही खेळ खेळो,लाकडं चोरून आणो.या सार्‍या खेळात घानमाकडाचा खेळ खेळतानं भल्ली मजा ये. एका जमिनीत गाडलेल्या उभ्या खांबावर कमरीएवढ्या उंचीवर एक आडवं धनुष्याच्या आकाराचं लाकूड फसवून ठेवलेलं राहे. त्याच्या दोन्ही टोकावर पोट्टे बसून गरगर त्याले फिरवून दे. कोणी पडे तर कोणी गनगन फिरवत राहे. मज्जाच मज्जा!
आमच्या लाह्यानपनी भीक मांगायले एक कैकाडीन ये. ते आली तर तिले पाहून आम्हाले भाईच भेव लागे! होतीच राजेहो तशी त्ये! भुतावानी! तिचे ते लट्टारे बट्टारे केसं, लाल लाल डोळे, पांढरे-काळे बटबटीत दात, एखाद्या डाकिणीसारखीच दिसे ते!कई जल्मात तिनं आंघोळ नसन केली!
आमच्या दाराशी ते आली का जोेरानं ओरडून म्हणे, ‘‘देवो माय, भाकर तुकडा, देवो माय, माही माय देते, भाकर देते, देवो माय’’ असं म्हणून नाचू लागे. आम्ही तिले खिजवून गाणं म्हणाले मांगं लागो! तवा ते भसाड्या आवाजात तिचं नेहमीचं गाणं म्हणे,‘‘सय्यरपुरामंदी गहू-तांदूळ भारी कू, वयकू नाही आला टोपीवाल्याचा मुलूकू॥ अन् नाचू लागे. आमाले मजा वाटे. आम्हाले सागरगोट्याभी कही कही ते दे! गुंजाभी.
आम्ही मोर्शीले राहो तव्हा आमच्याच शेजारी देशपांडे राहे! भारीच शिरीमंत होते ते. गडीमानसं, जमीनजुमला, गाईम्हशी, गाडीघोडे सारं काही होतं त्याईच्याकडं. भला मोठा वाडा होता त्याईचा. त्याईचे चार भाऊ अन् आमचे चौघे भाऊ एकमेकांईचे मस्त दोस्त होते! त्याईच्यातला सर्वात लाह्यना थो माहा दोस्त! त्याले मी नानाबेंड्या म्हनो. काऊन तर त्याच्या व्हटाले बेंड व्हतं म्हणून. त्याच्या मोठ्या भावन्लेभी अशाच जोडनावाने ओळखे. मोठ्याले बाबू उंट, दुसरा अण्णा घोडा, मंग भैया बरणी! अशीच परथा व्हती तवा हाक मारायची आमच्या आपसात.
आताआत्ताची गोष्ट हाये, मी पाहुनचाराले माह्या साळ्याकडे गेलो होतो त् तिथं कसा हा नानाबेंड्या मले भेटला. माह्या साळ्याचा अन् त्याचा दोस्ताना! दोघंबी शिरीमंत अन् कलबात जाये खेळाले! तिथंच मले तो भेटला. तिथल्या कॉलेजात तो म्हणे प्रिन्सीपाल व्हता. भेटल्याबरोबर माह्या तोंडून आपसुखच जोरदार ‘नाना बेंड्या का रे तू?’ असंच निंघालं. तोभी हरकला अन् गळामिठी पडला. त्यानं मले घरी बलावून त्याच्या लक्षुमीच्या हातचं पुरण-वरणाचं मस्त जेवाले दिलं? त्याची लक्षुमी त् आमच्या लाह्यानपन्‌च्या आठुनी ऐकू ऐकू हासू-हासू लोटपोट झाली! त्याच्या घरी सख्या नावाचा गडी होता. हा नाना लाह्यानपनी भल्लाच इबलीस होता. कोण्णाले ऐकेच नाये! तवा या सख्या गड्यानं आपले दात वासवून दाखवले का, हा आपल्या मायच्या नावाने ओरडून म्हणे, ‘नानी पाय नं वं, सख्या भेववते नं वं! बैेलाचे दात दाखवते नं वं!’ नानाची लक्षुमी भल्ली हासे!
एक तं तुम्हाले सांगायचं राहूनच गेलं ना! माहा जनम बराबर कृष्णाच्या जनम्‌दिवसीच झालता! वान नाही तरी गुन मात्र थोडे थोडे आपसुखच आलते!माझ्या मैतरणी लाह्यानपनापासून राहेच.अशीच एक लाह्यानपनची माही मैतरीण होती!तिचं नाव भी कसं राधाच राहावं! आम्ही दोघं खूप खेळो, अभ्यास करो, गोष्टी सांगत बसो अन् कधी कधी एकमेकाच्या खोड्याभी काढो. एकदा त् तिनं मजाच केली. तिले माहीत होतं की मले लिमलेटच्या गोळ्या भलत्याच आवडे.तवा आतासारखी चॉकलेट थोडीच भेटे. त्याच्याच्यानं या लिमलेटच्या गोळ्याईचंच आम्हाले कवतुक वाटे! तर ते राधा मले काय म्हने ‘बाबू, तुले लिमलेटची गोळी आवडते ना? पाहिजे असन् तर तिले जिंकून घ्यावी लागन्. ह्ये पाय, या लिमलेटच्या गोळीले मधामधी दोरा बांधला आहे. त्या दोराचं एक टोक तू धर आपल्या तोंडात अन् दुसरं टोक मी धरते आपल्या तोंडात. जो अगुदर तोंडात दोरा गुंडाळत लिमलेटच्या गोळीपाशी येईन त्यालेे ते मिळेल.’मंग काय आम्ही गोळी जितायच्या चेवानं जे भिडलो दोरा तोंडात धरून गुंडाळायला तर आम्हाले समजलंच नाही आम्ही दोघंही कसे एकदमच त्या गोळीपाशी येऊन पोहोचलो ते! अन् कशी त्याच वक्ती माही माय तिथं यायलाभी एकच गाठ पडली.मंग काय इचारता? चांगलीच भादरल्या गेली आमची.
आता ते लाह्यानपन्‌चे दिस आठुले का वाटते देवानं आपल्याले नेहमीसाठीच लाहान काहून का नसन् ठेवलं? आता सोताचे घर, बगीचा, मुलं, सुना, सारं काही आहे. एकाद्या वक्ती घरच्या बगीच्यात बंगईवर बसून त्या आठुनीत मन रमून जाते तवा कशी घरची लक्षुमी मले इचारते, ‘काहूनजी कोनाची आठुन झाली?’मी भानावर येऊन तिले खिजवतो, ‘तुह्या भईनीची?’
अरविंद पांडे

✎ Edit

Posted by - Admin,
on - बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS