सेमीकंडक्टर उत्पादनात भारत पुढील पाच वर्षांत उच्च पातळीवर

– अश्विनी वैष्णव यांचा विश्वास,
नवी दिल्ली, (०४ मार्च) – देशात नवीन उत्पादन प्रकल्प उभारून तैवान, दक्षिण कोरिया आणि चीनचा दबदबा संपुष्टात आणण्यासाठी उत्पादकांना १० अब्ज डॉलर्सची प्रोत्साहन योजना जाहीर केली. या माध्यमातून भारत पुढील पाच वर्षांत सेमीकंडक्टर उत्पादनात उच्च पातळी गाठेल, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.
भारताने उत्कृष्टपणे तयार केलेली धोरणे उत्पादकांना नवीन फॅब (सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट) स्थापन करण्यास आणि संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत आहेत. सेमीकंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अत्यावश्यक घटक आहेत. ते वाहनांपासून ते संगणक, मोबाईल फोन आणि अगदी वॉशिंग मशिन्समध्ये वापरले जातात.
भारतात आधीच प्रसिद्ध वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहेत, संगणक उत्पादक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादकही आहेत. आता भारत सेमीकंडक्टर उत्पादनासह उत्पादन मूल्य श्रृंखला वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहनामुळे मायक्रॉन आणि टाटासह चार कंपन्या सेमीकंडक्टर उत्पादनात उतरल्या आहेत.
मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक
चीनच्या टाळेबंदीमुळे सेमीकंडक्टरचा जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आणि कंपन्या तसेच विविध देशांतील सरकार उत्पादनाचा पर्यायी शोध घेऊ लागले. भारतात जाण्याबाबत विचार करणारे लोक आता किती लवकर भारतात जाऊ शकतो, असे विचारत आहेत. हा मोठा बदल होत आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्यक्षात प्रत्येक मोठी कंपनी भारतात येण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा