वंचितला सहा जागा देण्यावरून मविआत मतभेद
मुंबई, (९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून, वंचितला किती जागा द्यायच्या, यावरून आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला किमान पाच ते सहा जागा मिळाव्या, असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मत आहेत, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांची वंचितला फक्त तीन जागा देण्याची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शनिवारी महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक होणार आहे. त्यात अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मविआची आणखी एक बैठक होऊन त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने वंचितला किती जागा द्यायच्या, यावर १४ किंवा १५ मार्चच्या सांगलीतील सभेपूर्वी अंतिम निर्णय घ्यावा, असा अप्रत्यक्ष इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
महाविकास आघाडीची वंचितसोबतची पुढील चर्चा थेट प्रकाश आंबेडकरांशीच होणार आहे. याआधी वंचितच्या वतीने पक्षाचे नेते मविआच्या बैठकीत जायचे. आता महाविकास आघाडीने थेट प्रकाश आंबेडकरांशीच चर्चा करावी, अशी अट घालण्यात आली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या या भूमिकेला प्रकाश आंबेडकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांसोबत आता थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात चर्चा करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

on - सोमवार, ११ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा