आता लक्ष लोकसभेच्या विशेष अधिवेशनाकडे
नवी दिल्ली, (११ जुन) – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ सरकारचा रविवारी राष्ट्रपती भवनात शपथविधी झाला. सोमवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. आता सर्वांचे लक्ष लोकसभेच्या अधिवेशनाकडे लागले आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वांत प्रथम सरकार स्थापन होते, त्यानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले जाते. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीसाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावले जाते. या विशेष अधिवेशनासाठी सभागृहातील सर्वांत ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी सुलतानपूरमधून जिंकल्या असत्या, तर त्या नवव्यांदा लोकसभेवर निवडून आल्या असत्या. बहुधा त्या लोकसभेेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य राहिल्या असत्या. त्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होऊ शकली असती. दोनतीन दिवसांच्या या अधिवेशनात सर्व निर्वाचित सदस्यांचा शपथविधी होतो. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होते. सामान्यपणे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांशी विचारविनिमय करून लोकसभेचा नवा अध्यक्ष निवडतात. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षात मतैक्य झाले नाही, तर मात्र या पदासाठी निवडणूक होते.
जुलै महिन्यात नियमित अर्थसंकल्प मांडण्यासाठी संसदेचे पुन्हा एकदा अधिवेशन बोलावले जाते. २४ जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल, २४ आणि २५ जूनला नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल, तसेच २६ जूनला लोकसभा अध्यक्षाची निलडणूक होईल, अशी चर्चा आहे. पण, लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी याला दुजोरा दिला नाही. विशेष अधिवेशनाच्या तारखांबाबत अद्याप कोणताच नर्णय झाला नाही, असे त्यांनी सांगितले. संसदेचे विशेष अधिवेशन कधी बोलवायचे याचा निर्णय सरकार घेत असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा